रत्नागिरी ते मुंबई अवघ्या ३ तासांत , असे असतील तिकीट दर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोकणवासियांना मोठी भेट दिली आहे. मुंबईतील भाऊचा धक्का ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपर्यंत आता रोरो फेरी सेवा सुरू होणार आहे. 1 सप्टेंबरपासून हवामानाचा अंदाज पाहून रोरो सेवा सुरू होणार होणार आहे. या रोरो सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे, ही फेरी 25 नॉटच्या वेगाने धावणार असून दक्षिण आशियातील सर्वात वेगवान फेरी असणार आहे.

रस्तेमार्गाने मुंबईतून रत्नागिरीला किंवा सिंधुदुर्गला पोहोचण्यासाठी 10 ते 12 तास लागतात. मात्र रोरो सेवा सुरू झाल्यानंतर फक्त 3 ते साडेपाच तासांत प्रवास पूर्ण होणार आहे. मुंबई ते रत्नागिरीतल्या जयगडपर्यंत पोहोचण्यासाठी 3 ते 3.5 तासांचा वेळ आणि सिंधुदुर्ग ते विजयदुर्गपर्यंत पोहोचण्याचा वेळ 5 ते 5.5 तास इतका वेळ लागणार आहे.

एम2एम प्रिन्सेस नावाची ही फेरी एकाचवेळी 656 प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता आहे. त्याव्यतिरिक्त 50 चारचाकी वाहने आणि 30 दुचाकी वाहनेदेखील जाऊ शकतात. सायकलपासून ते मोठी बस घेऊन जाण्याची क्षमता या रो-रोमध्ये आहे.

किती असेल तिकीट?
इकोनॉमी क्लाससाठी 2,500 रुपये, प्रीमियम इकोनॉमीसाठी 4,000 रुपये तर, बिझनेस क्लाससाठी 7,500 रुपये, फर्स्ट् क्लाससाठी 9000 रुपये इतके तिकीट ठेवण्यात आले आहेत.

कारचे भाडे 6,००० रुपये, दुचाकीचे 1,००० रुपये, सायकलचे 600 रुपये, मिनीबसचे 13,000 रुपये, 30 आसनी बसचे 14,500 रुपये, 45 आसनी बसचे 17000 रुपये आणि मोठ्या बसचे 21,000 रुपये असेल.

सुरुवातीला ही सेवा रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील विजयदुर्ग इथपर्यंत असे. जयगड जेट्टी शहरापासून सुमारे ४० किमी अंतरावर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी, रत्नागिरीला ४-५ बसेस दिल्या जातील. भविष्यात, जेट्टी थेट रत्नागिरी टर्मिनलपर्यंत वाढवली जाईल. यासोबतच श्रीवर्धन आणि मांडवा सारखी ठिकाणे देखील जोडली जातील.