मुंबई शहर उडवण्याची धमकी देणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला उत्तर प्रदेशातील नोएडा येथे अटक करण्यात आली आहे. त्याने मुंबईत अनेक मानवी बॉम्ब ठेवून संपूर्ण शहर हादरवून टाकण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी सांगितले की, अश्विनी कुमार नावाचा ५१ वर्षीय व्यक्ती बिहारमधील पाटलीपुत्र येथील रहिवासी आहे. तो गेल्या ५ वर्षांपासून नोएडामध्ये राहत होता आणि व्यवसायाने ज्योतिषी होता. पोलिसांनी आरोपीला सेक्टर ७९ येथून अटक केली. आरोपीचा फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे. आता त्याला नोएडाहून मुंबईला पाठवले जात आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर एक धमकीचा संदेश आला आणि काही तासांनंतर त्याला अटक करण्यात आली. शहरात ३४ मानवी बॉम्ब पेरण्यात आल्याचे सांगण्यात आले. १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत. यावर मुंबई पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या व्यक्तीने स्वतःची ओळख लष्कर-ए-जिहादी म्हणून करून दिली आहे. या संघटनेचे म्हणणे आहे की १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत. या धमकीच्या संदेशात पुढे असे म्हटले आहे की स्फोटात ४०० किलो आरडीएक्स वापरला जाईल.

दहशतवाद्यांच्या धमकीची वेळ देखील चिंताजनक होती, कारण ती मुंबईतील गणेश विसर्जन उत्सवाच्या एक दिवस आधी आली होती. या धमकीच्या संदेशानंतर शुक्रवारी शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. अश्विनीविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरनुसार, त्याने त्याचा मित्र फिरोजला अडकवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांना दहशतवादी धमकीचा संदेश पाठवला होता.

पाटण्याच्या फुलवारी शरीफमध्ये २०२३ मध्ये फिरोजने दाखल केलेल्या गुन्ह्यात अश्विनीला अटक झाल्यानंतर तीन महिने तुरुंगात काढावे लागले. याचा बदला घेण्यासाठी अश्विनीने मुंबईत फिरोजच्या नावाने धमकीचा व्हॉट्सअॅप संदेश पाठवला. अश्विनीकडून ७ मोबाईल फोन, ३ सिम कार्ड, ६ मेमरी कार्ड होल्डर, १ सिम स्लॉट एक्सटर्नल, २ डिजिटल कार्ड, ४ सिम कार्ड होल्डर आणि १ मेमरी कार्ड होल्डर जप्त करण्यात आले.