भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात पाकिस्तानवर दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये 7 विकेट्सने विजय मिळवला. भारताचा हा या स्पर्धेतील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. भारताने या विजयासह सुपर 4 मधील स्थान निश्चित केलं आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं 128 धावांचं आव्हान भारताने 25 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने 15.5 षटकात 131 धावा केल्या. भारताच्या या विजयात एकूण 6 जणांनी प्रमुख भूमिका बजावली.
कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अभिषेक शर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या 6 खेळाडूंनी भारताच्या विजयात निर्णायक भूमिक बजावली.
कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह या त्रिकुटाने पाकिस्तानला 130 धावांच्या आत रोखण्यात निर्णायक भूमिका बजावली. हार्दिक पंड्याने याने पहिल्याच बॉलवर पाकिस्तानला झटका दिला. जसप्रीत बुमराह याने दुसऱ्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजाला मैदानाबाहेर पाठवलं. बुमराहने त्यानंतर पाकिस्तानच्या डावातील अखेरच्या काही षटकात आणखी एक विकेट मिळवली. बुमराहने अशाप्रकारे एकूण 2 विकेट्स मिळवल्या.
कुलदीप आणि अक्षर पटेल या दोघांनीही 4 ओव्हरमध्ये प्रत्येकी 18 धावा दिल्या. मात्र अक्षरच्या तुलनेत कुलदीपने 1 विकेट जास्त मिळवली. कुलदीप यादव याने एकूण 3 विकेट्स घेतल्या. कुलदीपने या 3 पैकी 2 विकेट्स सलग 2 चेंडूत घेतल्या. तर अक्षरने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
फलंदाजाचा धमाका
गोलंदाजानंतर भारतीय फलंदाजांनी सार्थपणे आपली जबाबदारी पार पाडली. भारताला विजय मिळवून देण्यात अभिषेक शर्मा, तिलक वर्मा सूर्यकुमार यादव या तिघांनी मोलाचं योगदान दिलं. भारतासाठी सूर्याने सर्वाधिक धावा केल्या. मात्र अभिषेक शर्मा याने स्फोटक सुरुवात मिळवून दिली. तर तिलकने महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
अभिषेकने 238 च्या स्ट्राईक रेटने 31 धावांची वादळी खेळी साकारली. त्यानंतर तिलक वर्मा यानेही 31 धावा केल्या. तर सूर्यकुमार याने सर्वाधिक योगदान दिलं. सर्याने 37 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 47 रन्स केल्या.
