महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( एमपीएससी ) घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ येत्या २८ सप्टेंबर रोजी राज्यभरात होणार आहे. यंदा प्रथमच यूपीएससीच्या धर्तीवर ही परीक्षा होणार आहे. मात्र या परीक्षेचा निकाल पूर्वीप्रमाणेच लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सन २०२४ पर्यंत राज्यसेवा परीक्षा पद्धत वस्तूनिष्ठ स्वरूपाची होती. पण यंदापासून (२०२५) या परीक्षेतील मुख्य परीक्षा पूर्णपणे लेखी होणार आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषयही निवडावा लागणार आहे. यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल साधारण १५ ते २० दिवसांत जाहीर करते. त्यामुळे उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी तीन ते चार महिने तयारीची संधी मिळते. परंतु एमपीएससीने मात्र निकाल प्रक्रियेत जुनीच पद्धत कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
यानुसार, पूर्व परीक्षेनंतर एका आठवड्यात प्राथमिक उत्तरतालिका प्रसिद्ध होते. त्यावर उमेदवारांना आक्षेप नोंदविण्याची संधी दिली जाते. त्यानंतर दुसरी उत्तरतालिका प्रसिद्ध होते आणि अखेरीस निकाल जाहीर होतो. या संपूर्ण प्रक्रियेस दोन महिने लागतात. त्यामुळे उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी कमी वेळ मिळतो. विद्यार्थी संघटनांनी यूपीएससीप्रमाणेच निकाल प्रक्रिया ठेवण्याची मागणी केली आहे. सध्या एमपीएससीचे कामकाज केवळ २०० कर्मचार्यांवर चालते. हे मनुष्यबळ अपुरे पडते. यासाठी आयोगाने राज्य सरकारकडे आणखी ११९ पदांच्या भरतीची मागणी केली आहे.
विद्यार्थी संघटनांनी यावर आक्षेप घेत यूपीएससीप्रमाणेच निकाल प्रक्रिया ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, पूर्व परीक्षेचा निकाल २० दिवसांत जाहीर झाल्यास सर्व उमेदवारांना समान आणि पुरेसा वेळ अभ्यासासाठी मिळू शकेल. याशिवाय, अनेकदा प्राथमिक उत्तरतालिकेतील प्रश्नांवर व उत्तरांवर उमेदवार आक्षेप घेतात आणि ते न्यायालयातही जातात. अशा प्रकरणांमुळे वेळापत्रक विस्कळीत होते. काही वेळा आयोगानेही उमेदवारांच्या आक्षेपांना न्यायालयात आव्हान दिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आयोगाने स्वतंत्र तज्ज्ञ समिती नेमून सर्व प्रश्नांची तपासणी करून २० दिवसांत निकाल लावावा, अशीही संघटनांची मागणी आहे.
