आशिया कप 2025 च्या सुपर-4 मधील भारत विरुद्ध श्रीलंकेचा शेवटचा सामना अतिशय रोमांचक झाला, त्यात सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने बाजी मारत विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघांनी 200 पेक्षा जास्तधावा केल्या, पण 40 ओव्हर्स खेळूनही सामन्याचा निर्णय आला नाही, म्हणून अखेर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने फक्त 2 धावा केल्या, आणि मग भारताने हा सामना जिंकला. पण याच सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान एक हैराण करणारी घटना घडली,
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. सुपर ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर श्रीलंकेचा फलंदाज दासुन शनाका (Dasun Shanaka)अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याच दरम्यान संजू सॅमसनने एक शानदार थ्रो मारला, तो थेट स्टंपवर आदळला. त्यानंतर दुसऱ्या पंचाने दासुन शनाकाला बाद घोषित केले.
ICC नियमामुळे वाचला दासुन शनाका
दासुन शनाकाने(Dasun Shanaka) कॅच आउटविरुद्ध हा रिव्ह्यू घेतला आणि तेव्हाच, अल्ट्राएज तंत्रज्ञानाने स्पष्टपणे दाखवले की चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही, परिणामी कॅच आउटचा निर्णय रद्द करण्यात आला. मात्र, त्यानंतर संजू सॅमसनचा रन आउट देखील अवैध घोषित करण्यात आला. त्याचं कारण म्हणजे पंच गाजी सोहेल यांनी धावबाद होण्यापूर्वीच दासुन शनाकाला झेलबाद दिले होते. जेव्हा जेव्हा पंच सामन्यात आऊटचा निर्णय घेतात तेव्हा तो डेड बॉल मानला जातो आणि डेड बॉलवर विकेट दिली जात नाही किंवा फलंदाजाने केलेल्या धावाही जोडल्या जात नाहीत.
आयसीसीचा हा नियम दासुन शनाकासाठी वरदान ठरला. पंच गाजी सोहेल यांनी भारतीय संघाला हा नियम समजावून सांगितला की एकदा बाद घोषित झाल्यानंतर आणि रिव्ह्यू घेतला की, चेंडू डेड होतो आणि म्हणूनच शनाका धावबाद होण्यापासून वाचला. या घटनेने सर्वच आश्चर्यचकित झाले, कारण जर अर्शदीपने कॅचसाठी अपील केले नसते तर शनाका आणि त्याचा साथीदार खेळपट्टीच्या मध्यभागी अडकले असते आणि श्रीलंकेचा डाव सुपर ओव्हरमध्ये संपू शकला असता.
