भारताचे दोन महान एकदिवसीय फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 च्या विश्वचषकात खेळतील की नाही याबद्दल अद्याप सस्पेंस कायम आहे. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या मते, रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही 2027 च्या विश्वचषकात खेळण्याबाबत वचनबद्ध नाहीत. आगरकरच्या विधानानंतर, रोहित शर्मा आणि विराट कोहली 2027 च्या विश्वचषकात खेळताना दिसणार नाहीत, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. हा लाखो भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
तर माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सुनील गावसकर यांनी सांगितले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची 2027 च्या विश्वचषकात खेळण्याची शक्यता प्रामुख्याने भारत पुढील काही वर्षांत किती एकदिवसीय सामने खेळतो? यावर अवलंबून असेल. दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
सुनील गावस्कर म्हणाले की, सध्या खूपच कमी वनडे सामने खेळले जात असल्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावसकरांनी मान्य केले की, 2027 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी रोहित आणि विराटला कठीण वाटचाल करावी लागणार आहे.
सुनील गावस्कर पुढे म्हणाले की, “रोहित शर्मा आणि विराट कोहली 2027 वर्ल्ड कपमध्ये खेळतील की नाही, हे प्रामुख्याने या गोष्टीवर अवलंबून आहे की, भारत पुढील काही वर्षांत किती वनडे सामने खेळतो. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेची तयारी करताना एका हंगामात फक्त 7-8 वनडे सामने खेळणं सोपं नसतं,” असे त्यांनी म्हटले.
सुनील गावस्कर यांच्या मते, 2027 च्या विश्वचषकाच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी विजय हजारे ट्रॉफीत भाग घ्यायला हवा, अर्थातच ते कोणत्याही वनडे आंतरराष्ट्रीय मालिकेत सहभागी होत नसतील तर त्यांनी हा सहभाग घ्यायला हवा. तंदुरुस्त राहण्याचा आणि सामना सराव सुरू ठेवण्याचा हा एक मार्ग आहे, असे त्यांनी म्हटले.
सुनील गावस्कर यांनी असेही म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची उपलब्धता हा योगायोग नाही. जर हा झिम्बाब्वे किंवा वेस्ट इंडिजचा दौरा असता तर ते दोघेही उपलब्ध नसतील याची मला खात्री आहे, परंतु हा दौरा ऑस्ट्रेलियामध्ये असल्याने आणि विश्वचषक अंतिम सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाकडून हरला असल्याने कदाचित दोघांनीही या सामन्यांसाठी उपलब्ध राहण्याचे ठरवले असेल.
