केंद्राकडून लवकरात लवकर मदत देतो, अमित शाहांकडून वचन; अजित पवार काय-काय म्हणाले ?

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे शनिवारपासून शिर्डीत मुक्कामी आहेत. काल रात्री शिर्डीत दाखल होताच अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बंद दाराआड महत्त्वाची चर्चा केली. या बैठकीत जवळपास पाऊण तास चर्चा करण्यात आली. या बैठकीचा मुख्य अजेंडा राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यासाठी तातडीने द्यायची मदत असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं भाष्य केलंय.

लोणी बाजारतळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार म्हणाले की, सहकार चळवळीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिता पुत्रांच्या पूर्णकृती पुतळ्यांचे अनावरण झाले. तो देखील पहिले सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा दुग्धशर्करा योग आहे. 1985 सालापासून साखर कारखान्यांना आयकर लावण्यात येत होता. मात्र, अमित शाह यांनी तात्काळ प्राप्तिकर रद्द करण्याचा निर्णय घेतला. 9500 कोटी रुपयांचा कर आपला माफ झाला. लाखो शेतकऱ्यांना आणि कारखान्याला दिलासा मिळाला. चांदा ते बांदा उस जिथे पिकतो तिथे सहकारी साखर कारखाने उभे झाले आणि आर्थिक सुबत्ता यायला लागली. ताकद ओळखायला लावायची आणि सशक्त करायचं हा यामागचा उद्देश होता.

आम्हाला अमित भाई सांगत आहेत. कमी पाणी, कमी खतात ऊस पीक काढा. एआयचा वापर करा आणि काही मदत लागली तर सांगा. केंद्र सरकार मदतीला पुढे आलं आहे. अमित शाह यांनी सांगितलंय की बायप्रोडक्ट संदर्भात देखील मी मदत करतो. काही कारखाने निवडून आणि प्रोडक्ट तयार करण्याचा प्रयत्न करु. साखरेचे भाव 2100 पर्यंत खाली यायचे मात्र कितीही झालं तरी 3300 रुपयांच्या खाली आता साखर विकता येत नाही. त्याच इथेनॉल आणि बायप्रोडक्टची भर पडते आहे. माझी विनंती आहे की, निवडणुकीच्या वेळी काय राजकारण करायचं आहे ते करा. मात्र नंतर मदत करा आणि हातभार लावा, असे अजित पवार यांनी म्हटले.