वुमेन्स वर्ल्ड कप 2025 मध्ये टीम इंडियाने आपल्या यशाचा सिलसिला कायम ठेवत पाकिस्तानला हरवलं. कोलंबो येथे हा सामना झाला. या मॅचमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने दमदार गोलंदाजी केली. पाकिस्तानला 88 धावांनी धुळ चारली. सोबतच वर्ल्ड कपमधील आपले दोन सामने जिंकून टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाचा या सामन्यात विजय निश्चित दिसत होता. आपण जिंकलो असलो, तरी या सामन्यात अशा काही गोष्टी पहायला मिळाल्या त्यामुळे टीमचं टेन्शन वाढणार आहे. टीम इंडियाने अशा चूका केल्या, ज्या त्यांना मजबूत संघाविरुद्ध भारी पडू शकतात.
मागच्या सामन्याप्रमाणे या मॅचमध्येही टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला सूर गवसला नाही. खासकरुन उपकर्णधार स्मृती मंधाना आणि कॅप्टन हरमनप्रीत कौरच अपयश जास्त त्रास देणारं आहे. टुर्नामेंट सुरु होण्याआधी धावांचा पाऊस पाडणाऱ्या स्मृती मंधानाचा स्कोर 8 आणि 23 आहे. प्रतिका रावल (31) आणि हरलीन देओल (46) आपल्या चांगल्या सुरुवातीला मोठ्या स्कोरमध्ये बदलू शकल्या नाहीत. सलग दुसऱ्या सामन्यात टॉप 5 मध्ये कुठलाही फलंदाज अर्धशतकी खेळी करु शकला नाही. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातही अशीच स्थिती राहिली तर विजयाची अपेक्षा करण्यात अर्थ नाही.
टीम इंडियाची गोलंदाजी जितकी चांगली होती, फिल्डिंगमध्ये तितकी साथ मिळाली नाही. दीप्ति शर्मा आणि हरमनप्रीत कौरने दोन अचूक थ्रो करुन रनआऊट केले. पण या दोघींशिवाय टीम इंडियाची ग्राऊंड फिल्डिंग आणि कॅचिंग चांगली झाली नाही. विकेटकिपर ऋचा घोषने दोन सोप्या कॅच सोडल्या. त्यामुळे एकवेळ सिदरा अमीन आणि नतालिया परवेजने 69 धावांची भागीदारी करुन टीम इंडियाला टेन्शन दिलेलं. श्रीचरणीने सुद्धा आपल्या गोलंदाजीवर एक कॅच सोडली. त्याशिवाय काही प्रसंगी टीम इंडियाने मिसफिल्डिंग केली, त्यामुळे अतिरिक्त रन्स गेल्या. फिल्डिंगमधील या चूकांमुळे पुढे टीम इंडियाच नुकसान होऊ शकतं.
तिसरी चूक DRS मध्ये झाली. जिथे कॅप्टन कौरने सतत चुकीचे निर्णय घेतले. या बाबतीत विकेटकीपर ऋचाने सुद्धा चांगली साथ दिली नाही. पाकिस्तानच्या इनिंगमध्ये पहिल्याच चेंडूवर अंपायरच्या निर्णयाविरोधात रिव्यू घेण्यात आलेला. ज्यात टेंडू लेग स्टम्पच्या बाहेर जाताना दिसत होता. मात्र, त्यानंतर तीनवेळा अंपायरने LBW चा निर्णय फेटाळून लावला, तरीही टीम इंडियाने रिव्यू घेतला नाही. या तिन्ही प्रसंगात चेंडू थेट स्टम्पवर लागणार होता. काहीवेळाने पुन्हा रिव्यू घेतला, तेव्हा हा खराब निर्णय ठरला. यावेळी चेंडू बॅटच्या जवळही नव्हता. कॅचच्या अपीलवर रिव्यू घेण्यात आला. अशा प्रकारे टीम इंडियाने आपले दोन्ही रिव्यू खराब केले आणि हाती आलेली संधी गमावली.
