नांदेड-हिंगोली महामार्गावरील भाटेगाव येथील वळण रस्त्यावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली. 10 रोजी सायंकाळच्या सुमारास सांगोला येथून पाटणा कडे फळांची वाहतूक करणारा ट्रक (क्र.एमएच 34 बीझेड 3698) भाटेगावच्या धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन पलटी झाला.
या ट्रकमध्ये चिकू, खरबूज, अंगूर आदी विविध प्रकारची फळे भरलेली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक पलटी होताच रस्त्यावर सर्वत्र फळांचा सडा पडला.
अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठे, डोंगरकडा येथील जमादार संतोष नागरगोजे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी व बघ्यांनी पडलेल्या फळांचा आस्वाद घेत जमेल तेवढी फळे सोबत घेऊन जाण्याची लगबग सुरूच होती. काही वेळातच रस्त्यावरील बहुतांश फळे प्रवाशांनी उचलून नेल्याचे चित्र दिसून आले.
विशेष म्हणजे भाटेगाव येथील हा वळण रस्ता अपघातांसाठी कुप्रसिद्ध असून याच ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या धोकादायक वळणावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करूनही संबंधित विभागाकडून उपाय योजना कराव्या अशी मागणी हिट आहे.
