माझी रोहित पवारांना विनंती आहे की त्यांच्या काकांचा अपघात झाला आहे. त्यांना जेवढं दु:ख झालं तेवढं आम्हालाही झालेलं आहे. आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे. आम्हीही शंका उपस्थित केल्या आहेत. पण इतर गोष्टी आमच्या पक्षांतंर्गत आहेत. त्यात त्यांनी सहभागी होऊ नये, असा सल्ला मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे एका विमान अपघात निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आता या दुर्दैवी घटनेनंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यातच आता हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांच्या चौकशीही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य केले.
रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी त्यावर सखोल अभ्यास करुन एक प्रेझेन्टेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की लोकांच्या मनातल्या शंका या गेल्या पाहिजेत. या ज्या शंका उपस्थित झाल्या आहेत किंवा जे काही आक्षेप घेतले गेले त्याची सखोल चौकशी राज्य सरकार आणि केंद्र सरकार करेल. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतला आहे. त्याची चौकशी सुरु आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
त्यात रोहित पवारांनी सहभागी होऊ नये
रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांच्या काकांचा अपघात झाला आहे. त्यांना जेवढं दु:ख झालं तेवढं आम्हालाही झालेलं आहे. आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे आणि आम्हालाही ज्या काही शंका आहेत त्या आम्ही व्यक्त केल्या आहेत. पण बाकीच्या गोष्टी आहेत तो आमचा पक्षाचा अंतर्गत गोष्टी आहेत. त्यात रोहित पवारांनी सहभागी होऊ नये, असा खोचक टोलाही हसन मुश्रीफ यांनी दिला.
सध्या रोहित पवार यांनी जी माहिती दिली आहे. त्याचा ते पाठपुरावा करतात. एक पुतण्या म्हणून मी त्यांची अस्वस्थता समजू शकतो. सुनील तटकरे आणि अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांची काय एकदा भेट झाली असेल का? अनेकवेळा भेट झाली असेल. प्रफुल्ल पटेल हे पवारांपासून कार्याध्यक्ष आहेत. आजही ते कार्याध्यक्ष आहेत. अजित दादानंतर ते आता एक प्रमुख नेते आहेत. हे दोघेही विलन कसे होऊ शकतात. यांना टार्गेट का केलं जातंय. त्यामुळे विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तसेच आमच्या पक्षात लुडबूड करण्याचा प्रयत्न ते करत आहे, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.
दादा गेल्यानंतर परिस्थिती बिघडली
विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेकदा मांडला आहे की अजित दादा चर्चा करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता त्या चर्चेत नव्हता. त्यामुळे त्यांची चर्चा झाली नाही, असा दावा मी केलेला नाही. दादा गेल्यानंतर परिस्थिती बिघडली आहे. आता भाजपला विश्वासात घ्यावं लागेल, असेही हसन मुश्रीफांनी सांगितले.
