महाराष्ट्र पाणी देऊ शकत नसेल, तर कर्नाटकात जाऊ”

मंगळवेढ्याचे भाजप आमदार समाधान अवताडे यांनी कोणालाही कर्नाटक जायची गरज पडणार नसून, महाराष्ट्र न्याय देईल अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता संतप्त झालेल्या या 24 गावातील शेतकरी आणि पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत . ”ना प्यायला पाणी, ना शेतीला पाणी” अशी अवस्था आमच्यात पिढ्यान पिढ्या भोगत असताना अजून किती वेळ न्यायासाठी वाट पाहायची? अशा भूमिकेवर हे हजारो शेतकरी आले आहेत .

आता या 24 गावातील सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे. “आम्हाला तुम्ही अलमट्टी धरणातून पाणी द्यावे, आम्ही कर्नाटक मध्ये येण्यास तयार आहोत” असे साकडे सिद्धरामय्या यांना घालणार असल्याचे यावेळी अंकुश पडवळे आणि इतर जणांनी माझाशी बोलताना सांगितले. या गावात कायमच पाण्याचे दुर्भिक्ष आहे. यासाठी गेली 50 वर्षे फक्त तुम्हाला पाणी देतो म्हणून अनेक आमदारांनी आमदारकी मिळविली पण आम्हाला कधी पाणी मिळाले नाही.

शेतीला तर थेंबभर पाणी नसल्याने पाऊस पडला तर आमचे पीक येते, अन्यथा दुसऱ्याच्या रानात आमच्या पिढ्या कामे करून कसेतरी जगतात. आता पिण्याच्या पाण्यासाठी देखील मारामाऱ्या नित्याच्या झाल्या असून पाणी घेण्यासाठी भांडणेसोडवावीत? की कामाला जाऊन पैसे मिळवावेत? हा आमच्या पुढचा प्रश्न असल्याचे खुपसंगी येथील उत्तम भोसले सांगतात.हीच अवस्था गावातील महिलांच्या असून आता इतर ठिकाणी कमाला गेलो तर चार पैसे जगण्यासाठी मिळू शकतील, पण प्यायला पाणी नसल्याने काम सोडून आधी पाणी आणायची वेळ आमच्यावर येते असे गाऱ्हाणे या महिला मांडतात. जर आम्हाला पाणीच महाराष्ट्र देणार नसेल तर आम्ही इथे राहून काय करायचे असा सवाल या गावातील महिला करीत आहेत. दरम्यान या 24 गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना प्रस्तावित असून यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी देखील झाली आहे . माञ हा प्रकल्प अडकून पडला असून लोकसभा निवडणूक आचारसंहिते पूर्वी जर या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी देऊन निधी वर्ग केला नाही, तर आम्ही लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून कर्नाटक मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे हे 24 गावातील ग्रामस्थ सांगतात.