कोल्हापूर हे आंदोलनाचं शहर म्हणून ओळखलं जातं. या कोल्हापुरात अनेक मोठमोठे आंदोलन झालेत. त्यामध्ये सरकार केंद्र सरकारला देखील आपल्या आंदोलनाची दखल घेण्यास कोल्हापूरकरांनी भाग पाडले.मात्र याच कोल्हापुरात कधी कधी अशी हटके आंदोलने होतात जी देशभर गाजतात.
त्याच कोल्हापुरात एक अशी गमतीशीर सायकल रॅली निघाली ज्याची चर्चा सुद्धा आता अख्ख्या कोल्हापुरात रंगलीये. कोल्हापुरातल्या खासबाग मैदान येथून प्रयाग चिखली इथं असणाऱ्या पंचगंगा नदीच्या संगमापर्यंत ही सायकल रॅली निघालीये. सध्या या रॅलीची चर्चा सुरू आहे ती म्हणजे या रॅलीमध्ये सायकलला लावण्यात आलेल्या फलकांमुळे.या फलकांवर लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच, पाहिजे मटन स्वस्त झालंच पाहिजे, पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे.
अशा अनेक मजेदार मागण्या घेऊन मंगळवार पेठेतल्या चिक्कूमंडळाची गँग थेट प्रयाग चिखलीतल्या पंचगंगा नदीच्या संगमावरती पोहोचलीये.अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो लावलेल्या सायकलचे पूजन करून या रॅलीला सुरुवात झाली. एकीकडे मजेदार फलक असणाऱ्या या सायकल रॅलीचा उद्देश मात्र सर्वांच्याच भल्याचा होता. तो म्हणजे नागरिकांनी सायकलचा वापर करून प्रदूषण टाळले पाहिजे आणि आपलं आरोग्य सुद्धा जपलं पाहिजे.
कोल्हापूर शहरातील खासबाग ते मिरजकर तिकटी, बिनखांभी गणेश मंदिर, महाद्वार रोड करत रॅली शिवाजी पुलावरून मुख्य मार्गावरून प्रयाग चिखलीपर्यंत पोहोचली. ही अनोखी सायकल रॅली पाहून अनेकांचे चेहरे अगदी बघण्यालायक झाल्याचं दिसून आलं. या रॅलीत अगदी वृद्ध व्यक्ती देखील सहभागी झाले होते.