बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरली; शेकडो जखमी 

बिहारमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बिहारच्या बक्सरमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसचे तब्बल २१ डब्बे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

डब्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम रात्री उशीरापर्यंत सुरू होतं. गेल्या सहा महिन्यातील रेल्वे अपघाताची ही दुसरी घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नॉर्थ-इस्ट एक्सप्रेस राजधानी दिल्लीच्या आनंद विहार स्टेशनवरून गुवाहाटीच्या कामाख्या स्टेशनकडे निघाली होती.

ट्रेन बिहारच्या बक्सर जिल्ह्यात आली असता, दानापूर विभागातील रघुनाथपूर स्टेशनजवळ दोन एसी डब्यांसह २१ डबे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, या दुर्घटनेत आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेवर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी दु:ख व्यक्त केलं असून घटनेसंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मी केदारनाथला प्रार्थना करतो की सर्व प्रवासी सुरक्षित असावेत. मदतकार्य सुरू झाले आहे. वैद्यकीय पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अपघातग्रस्त मदत वैद्यकीय व्हॅन अपघातस्थळी पोहोचलं आहे, असं ट्वीट मंत्री अश्विनी चौबे यांनी केलंय.