भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ गेल्या वर्षीच संपलेला आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सध्या त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अशा दुहेरी भूमिकेत सध्या नड्डा काम करत आहेत. भाजपमध्ये एक व्यक्ती, एक पद असा नियम आहे. पण नड्डा त्या नियमाला अपवाद ठरत आहेत. नड्डा यांचा कार्यकाळ संपून दीड वर्ष उलटलं तरीही भाजपला अद्याप दुसरा अध्यक्ष निवडता आलेला नाही. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर दिल्लीत अध्यक्ष पदाच्या निवडीचे वारे वाहू लागले आहेत. या बदलाच्या वाऱ्यांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची शक्यता आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन विजयी झाले. त्यांच्या विजयानं ओबीसी व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर विराजमान झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील ओबीसी समाजातून येतात. विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या आदिवासी समाजातून येतात. त्याआधीचे राष्ट्रपती राहिलेले रामनाथ कोविंद दलित समाजातील होते. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर बदललेली सामाजिक समीकरणं पाहता आता भाजपच्या अध्यक्षपदी ब्राह्मण व्यक्तीला संधी मिळू शकते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकटवर्तीयानं याबद्दलची माहिती दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण चेहऱ्यासाठी आग्रही आहे. या शर्यतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. पक्षात पुढील पिढीचं नेतृत्व घडवण्यासाठी फडणवीस यांना संधी दिली जाऊ शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कायमच फडणवीस यांच्या पाठीशी राहिला आहे. फडणवीस दिल्लीत गेल्यास राज्यात राजकीय भूकंप घडू शकतो. फडणवीस भाजपचे अध्यक्ष झाल्यास राज्यातील सरकारचं नेतृत्व कोणाकडे दिलं जाणार? भाजप कोणाला संधी देणार? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.
भाजप आणि संघ यांच्यात एकमत होत नसल्यानं अध्यक्ष पदाच्या निवडीचा विषय दीड वर्षांपासून सुटलेला नाही. राष्ट्रीय अध्यक्षपदी पु्न्हा गुजराती व्यक्तीला संधी देण्यास संघ तयार नाही. त्यामुळे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या नावांना संघाचा विरोध आहे. चंद्रकांत पाटीलदेखील केंद्रात मंत्री आहेत. नड्डा यांच्या आधी अमित शहा भाजपचे अध्यक्ष होते. त्यामुळे पुन्हा एकदा गुजराती चेहऱ्याला अध्यक्षपद देण्यास संघाचा ठाम नकार आहे.
दुसरीकडे संघानं संजय जोशी यांचं नाव सुचवलं आहे. पण त्यांच्या नावाला भाजप श्रेष्ठींचा विरोध आहे. मोदी आणि संजय जोशी यांनी गुजरातमध्ये ९० च्या दशकात सोबत काम केलं. दोघांच्या कामांची पद्धत वेगळी आहे. त्यातून दोघांमध्ये मतभेद झाले. ते अतिशय टोकाला गेले. त्यामुळे संजय जोशी यांना अध्यक्षपद देण्यास भाजप नेतृत्त्वाचा विरोध आहे.
