महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी पहाटे चकमक सुरु झाली. या चकमकीत पोलिसांनी चार नक्षलींचा खात्मा केला आहे. पोलिसांचे C 60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये पहाटेच्या सुमारास दीड ते दोन तास चकमक झाली. या चकमकीनंतर पोलिसांना घटनास्थळी 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा मोठा डाव या नक्षलींनी आखला होता. पोलिसांनी हा डाव उधळून लावला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर 36 लाखांचे बक्षीस होते.
लोकसभा निवडणुकी दरम्यान मोठा घातपात घडवण्यासाठी गडचिरोलीच्या जंगलात एक मोठा नक्षलवादी गट लपल्याची गुप्त माहिती महाराष्ट्र पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर महाराष्ट्र पोलीस आणि सीआरपीएफच्या विशेष सी-60 कमांडोंनी जंगल परिसरात कारवाई सुरू केली. कमांडो जंगलात पोहचताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. कमांडोकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. सुमारे दोन तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून ४ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून एके ४७ रायफलसह अनेक शस्त्रेही जप्त केली आहेत. पोलिसांना त्यांच्याकडून नक्षलवादी साहित्यही मिळाले आहे.