महायुतीत ठिणगी!

अमरावती मतदारसंघाचा तिढा सुटण्यापेक्षा आता वाढताना जास्त दिसतोय. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. वेळ पडली तर आपण युतीतून बाहेर पडू. प्रहार पक्षाचा उमेदवार अमरावती लोकसभेला उभा करु. पण नवनीत राणा यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आता आम्ही अडचणीत येतोय, असं वाटतंय”, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांची ही भूमिका भाजप आणि महायुतीसाठी धोक्याचा इशारा आहे. बच्चू कडू यांचा अमरावतीत मोठा चाहता वर्ग आहे. तसेच सर्वसामान्य नागरीक बच्चू कडू यांच्या शब्दाचा मान ठेवतात. त्यामुळे बच्चू कडू यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर त्याचा मोठा फटका महायुतीला बसू शकतो.