खानापूर तालुक्यातील या गावात आजही जोपासली जाते परंपरा…

मुखी हरिनामाचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या निनादावर दहा ते बारा हजारांहून अधिक रोट्या तयार करीत सांगली जिल्ह्यातील घोटी खुर्द (ता. खानापूर) येथे बुधवारी तुकाराम बीजोत्सव साजरा करण्यात आला.सुमारे एक हजार ६०० किलो पीठाच्या रोट्या अन् पाऊण टन म्हणजेच ७५० किलो वांग्यांच्या भाजीवर ताव मारत हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला. घोटी खुर्द येथील ग्रामदैवत श्री राजूबुवा यांची समाधी असलेल्या या गावात दरवर्षी तुकाराम बीजोत्सव साजरा केला जातो. तत्पूर्वी आठवडाभर अगोदर भजन-कीर्तन, प्रवचनाचा सप्ताह असतो.

या सप्ताहाची सांगता होळी दिवशी केली जाते. गेल्या चार पिढ्यांपासूनची ही परंपरा घोटीकर ग्रामस्थांनी आजही जोपासली आहे. त्यानंतर तुकाराम बीजेदिवशी दुपारी १२ वाजता संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी झाल्यानंतर ‘वांगे-रोटी’ हा महाप्रसाद होतो. तुकाराम बीजेदिवशी सकाळी गावातील सर्व कुटुंबातील महिला एकत्रित येऊन मंदिराच्या पटांगणात तीन दगडांची चूल मांडून हरिनामाचा गजर व त्याला अभंगाची जोड देत रोट्या बनविण्यास सुरुवात करतात. दहा हजारांहून अधिक रोट्या बनविल्या जातात. प्रत्येक कुटुंबातील महिला या सोहळ्यात सहभागी होतात.