हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोनदा मैदान मारले. यामुळे या मतदारसंघाची भूमी शेतकरी चळवळीतील नेत्यांना अनुकूल असल्याचा निष्कर्ष काढीत यावेळी लोकसभा निवडणुकीचा फड मारण्याच्या उद्देशाने शेतकरी नेत्यांची एकच भाऊगर्दी झाली आहे.
स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, किसान नवजवान या नव्या संघटनेचे उमेदवार शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आणि जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक शिवाजी माने यांनी लोकसभा निवणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
हातकणंगलेत पूर्वीपासून प्रामुख्याने काँग्रेस- राष्ट्र्रवादीचे प्रभुत्व राहिले आहे. त्याला प्रथम शह दिला तो राजू शेट्टी यांनी. २००९ सालच्या निवडणुकीत या शेतकरी नेत्याने सहकार सम्राटांच्या या मतदारसंघात शेतकरी चळवळीलाही यश मिळते हे दाखवून दिले. पुढच्याही निवडणुकीत त्यांनी विजयाची पुनरावृत्ती केली. हातकणंगले मतदारसंघातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेतील तमाम नेत्यांची जडणघडण शरद जोशी यांच्या मुशीत झाली. जोशी यांच्याशी पटले नसल्याने शेट्टी यांनी स्वतःची स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन करून शिवार ते संसद हा प्रवास दोन वेळा करून दाखवला. आता तिसऱ्यांदा त्यांना संसद खुणावत आहे.