दीरासोबत लग्न करण्यासाठी २ जावां भिडल्या

धाकट्या दिरासोबत लग्न करण्यासाठी दोन जावांमध्ये बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला,की दोघींनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. इतकंच नाही, तर दोन्ही महिलांकडील माहेरची माणसं देखील एकमेकांसोबत भिडली. भर रस्त्यात सुरू असलेला हा राडा इतका गंभीर होता, की यामध्ये पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. 

या घटनेनंतर पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून दुसऱ्या महिलेचं दीरासोबत लग्न लावून दिलं आहे. एखाद्या सिनेमाच्या कथेलाही लाजवेल, असा हा धक्कादायक प्रकार बिहारच्या नालंदा जिल्ह्यात घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन महिलांमध्ये वाद झाल्याने या प्रकरणाची सध्या जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नालंदा जिल्ह्यातील हिसला मलामा गावात राहणाऱ्या हरेंद्र पासवान या तरुणाच्या मोठ्या भावाचे काही दिवसांपूर्वी आजारपणाने निधन झाले होते.

त्यामुळे हरेंद्रने आपल्या वहिनीसोबत लग्नगाठ बांधून त्याच्या मुलांचा सांभाळ करावा, अशी इच्छा नातेवाईकांची होती. या लग्नासाठी हरेंद्र तयारही झाला. मात्र, त्याचवेळी त्याच्या दुसऱ्या भावाच्या बायकोने मलाच हरेंद्रसोबत लग्न करायचं आहे, अशी इच्छा बोलून दाखवली. या महिलेचा हरेंद्रच्या संपत्तीवर डोळा होता.

दरम्यान, हरेंद्रसोबत लग्न व्हावं म्हणून शुक्रवारी दोन्ही जावांमध्ये बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला, की दोघींनी एकमेकींच्या झिंज्या उपटत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी दोन्ही महिलांचे माहेरची लोक सुद्धा एकमेकांसोबत भिडली. भर रस्त्यात हा राडा सुरू होता. अखेर कुणीतरी पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करी हा वाद मिटवला. मात्र, तरी देखील दोन्ही जावा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. अखेर पोलिसांनी लग्न झालेल्या एका महिलेला ताब्यात घेतलं आणि विधवा महिलेचं लग्न दिरासोबत लावून दिलं. सध्या संपूर्ण शहरात या अजब घटनेची चर्चा सुरू आहे.