पंचगंगेतील गाळ काढण्यासंदर्भात होणार लवकरच कार्यवाही!

मागील अनेक वर्षांपासून पंचगंगा नदीपात्रातील गाळ न काढल्याने साचला आहे. शिवाय नदीपात्राची खोली अत्यंत कमी झाल्याने गत काही वर्षापासून महापूराचाही धोका वाढत चालला आहे. त्यामुळे नदीपात्रात साचलेला गाळ काढण्याची नितांत गरज आहे. इचलकरंजी येथील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढून तो घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी देण्यासंदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पारीत केले आहेत.

दरम्यान या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकारी येडगे यांनी याची लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. आणि हे काम उन्हाळ्यातच शक्य असल्याने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार आवाडे यांनी सातत्याने केली होती.

या संदर्भात गुरुवारी आमदार आवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधत नदीपात्रातील गाळ शेतकऱ्यांनी मोफत काढून नेण्याबाबत परवानगी देण्यास तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या. जिल्हाधिकारी येडगे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर कार्यवाही सुरु करु असे सांगितले.