तर तिथेच सगळं संपतं.. अफेअरच्या चर्चांवर स्पष्टच बोलली तेजस्विनी पंडित

लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी चित्रपटसृष्टीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. सोबतच तिने आपल्या सौंदर्याने सगळ्यांना भुरळ घातली. तेजस्विनी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिने अनेक चित्रपटात दमदार भूमिका करत प्रेक्षकांवर छाप पाडली. मात्र यासगळ्या प्रवासात तेजस्विनीचं नाव दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. त्यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तिने आता तिची बाजू मांडली आहे. जिथे मी त्याला दादा म्हणते तिथेच माझ्यासाठी सगळं संपतं असं ती म्हणाली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने चाहत्यांचा हा गैरसमज दूर केला आहे.

तेजस्विनीने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यात बोलताना तेजस्विनीने मराठीतील कंपूशाहीबद्दलही भाष्य केलं. तेजस्विनी म्हणाली, ‘मी कुठल्या गटात नव्हतेच कधी. लोक उगाच म्हणतात की मी संजय दादाच्या गटात आहे. खरं तर सईने त्याच्याकडे जास्त काम केलंय. मी पडद्यामागे त्यांची खूप चांगली मैत्रीण आहे. आणि ऑनस्क्रीन मी फक्त ‘तू ही रे’ आणि ‘ये रे ये रे पैसा’ केलाय. दोनच चित्रपट केलेत. तरीही मला त्यांच्या गटात का टाकलं गेलं हे मला माहीत नाही. मी गटबाजीपेक्षा म्हणेन की एक कम्फर्ट झोन असतो. हा कलाकार आपल्याला त्रास देणार नाही, याचं नाव चांगलं आहे, इमेज चांगली आहे, पैसेही आपल्याला परवडतायत. मग ते त्या कलाकाराला कास्ट करतात. त्याच्यासोबत माझं जे नाव जोडलं गेलं होतं त्याबद्द्ल मी म्हणेन की मला आणि संजय दादाला, ज्याला मी दादा म्हणतेय इथेच खरं तर संपलंय सगळं.’

पुढे तेजस्विनी म्हणाली, ‘मला उत्तर द्यायची पण गरज नाहीये. आपल्या जेव्हा माहीत असतं की समोरची व्यक्ती आपल्या बापारुपी किंवा दादारूपी आहे. तिथे वेगळे विचार काय येणार, आपला दृष्टिकोन, विचार स्पष्ट आहेत तिथे कुणाला उत्तरं द्यायची आणि का द्यायची?” यासोबतच तेजस्विनीने अनेक गोष्टींवरील तिचे विचार या मुलाखतीत मांडले आहेत.