पंचगंगा नदी प्रदूषणाचे पंचनामे सुरू…

सामाजिक कार्यकर्त्याच्या दबावानंतर पंचगंगा नदीप्रदूषणाबाबत पुन्हा एकदा अधिकारी सक्रीय झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रदूषित पाण्याचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.मंगळवारी दुपारपर्यंत कोल्हापूरमधील राजाराम बंधारा, विन्स हॉस्पिटल, सिध्दार्थनगर परिसरातील जे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळते त्याची पाहणी करण्यात आली आहे.पंचगंगा प्रदूषणाबाबत १९९७ मध्ये उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते.

यानंतर २०१० मध्ये एका जनहित याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून तीन महिन्यातून आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. याला आता साडे नऊ वर्षे झाली तरी पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनत निघाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी संयुक्त पाहणीची मागणी केली होती.त्यानुसार ही पाहणी करून पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून इचलकरंजी आणि शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील अनेक ठिकाणी भेटी देवून तेथील वस्तुस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.