दुष्काळाची भीषण स्थिती धरणातील पाण्याने तळ गाठला…

राज्यभरात दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळत असताना, प्रामुख्याने मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा संकट उभं राहिलं आहे. महिलांना दूरवर पायपीट करत, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाणी भरावं लागत आहे. एकीकडे माणसांच्या या पाणी प्रश्नाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे प्राण्यांना देखील या दुष्काळाची झळ बसत असल्याचं चित्र आहे. हीच अवघड परिस्थिती अधोरेखित करणारं मराठवाड्यातील एक भीषण वास्तव पुढे आलं आहे. 

संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये असलेल्या ढेकू धरणातील पाणीसाठा संपल्याने असंख्य माशांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. पाण्याअभावी मासे कसे तडफडले असावेत ?  याचा विचारही करवत नाही. मराठवाड्याचा विचार केला तर या भागात अनेक धरणं आहेत. मात्र या जलाशयांचं योग्य नियोजन नसल्याने दरवर्षी ही दुष्काळ परिस्थिती उद्भवत असते. मराठवाड्यातला पाणी प्रश्न आजचा आहे, असं नाही. 

पाण्याअभावी पायपीट करावी लागणार किंवा वेळप्रसंगी जीव गमवावा लागणार अशा घटना वर्षांपासून चालत आलेल्या आहेत. मात्र प्रशासनाच्या मानसिकतेत कुठलाही फरक पडलेला दिसत नाही. वैजापूर मधील या ढेकु धरणातील पाणीसाठ्याच्या माध्यमातून जवळपासच्या 10 ते 12 गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या हे धरण कोरडं पडलं आहे. त्यामुळे महिलांना पायपीट करावी लागत आहे तर माणसांबरोबर प्राण्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. दहा दिवसांपूर्वी मतदानासाठी गावात फिरणारे नेते देखील आता दिसेनासे झाले आहेत. अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून येत आहे.