महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या हेतूनं राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेत सुरुवातीला १५०० रुपयांचा हफ्ता सर्व महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. निवडणुकीनंतर सर्व महिलांच्या खात्यात २१०० रुपये जमा केले जातील, असे सांगण्यात आले होते. मात्र निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर तीन महिने उलटले आहेत. तरी अद्याप लाडकी बहीण योजनेचा २१०० रुपये हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यातच आता लाडक्या बहिणींना सरकारने एक मोठा धक्का दिला आहे. राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ होणार नाही अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा २१०० रुपये करणार, असे महायुतीच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले होते. राज्यातील महिलांना याबद्दलचे वचन देण्यात आले होते. मात्र अद्याप या लाडकी बहीण योजनेचा वाढीव हफ्ता महिलांना मिळालेला नाही.
सध्या महिलांना १५०० रुपये हफ्ता दिला जात आहे. यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने ४६००० हजार कोटींची तरतूद केली होती. सध्या राज्यावर खर्चाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेचा वाढीव हफ्ता देण्यात येणार नाही.
लाडकी बहीण योजनेत महिला अपात्र ठरणार
दरम्यान लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिलांना अपात्र करण्यात आल आहे. तसेच सध्या लाडकी बहीण योजनेत विविध निकष लावण्यात आले आहे. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी निकष लावल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून ही योजना रद्द होईल, अशी चर्चाही रंगली होती.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे सांगितले आहे. लाडकी बहिणींसाठी ४५ हजार कोटी देत आहोत. त्याचा ताण आमच्या बजेटवर येणार आहे. २ कोटी ८० लाख महिला त्यात आहे. आम्ही आधी छाननी केली नाही. योजना लागू केली. त्यात निकष होते. काही लोकांनी निकष पाहिले नाही. तरीही फायदा घेतला. त्यामुळे आम्ही निकषात बसणाऱ्यांनाच यात ठेवणार आहोत. उद्या कॅगही आम्हाला जाब विचारेल. पण छाननीतून फार महिलाांना डावललं जाणार नाही. कमी महिला अपात्र ठरतील”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.