‘रेमाल’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम!

 बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ‘रेमाल’ बाबत भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. ‘रेमाल’ चक्रीवादळ सध्या सागर बेटांच्या दक्षिण पूर्वेस सुमारे 290 किमी अंतरावर आहे. बांगलादेशमधील खेपुपारापासून 300 किमी अंतरावर आहे. तसेच दक्षिण पूर्वेस आणि पश्चिम बंगालच्या उत्तर उपसागरावर कॅनिंगपासून 320 किमी दक्षिण पूर्वेस आहे. येत्या सहा तासांत या चक्रीवादळाचे रुपांतर भयंकर वादळात होणार आहे. त्यानंतर 26 मेच्या रात्री बंगालादेश आणि पश्चिम बंगालमध्ये हे वादळ दाखल होणार आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस आणि अतिवेगवान वारे वाहणार आहे. यामुळे रविवारी दुपारी 12 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत कोलकाता विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे 26-27 मे रोजी 80 ते 100 किमी प्रतीतासाने वेगाने वारे वाहणार असून मुसळधार पाऊस पडणार आहे.

‘रेमाल’ चक्रीवादळ 22 मे रोजी बंगालच्या उपसागरात सुरु झाले. सध्या तो मध्य बंगालच्या उपसागरात आहे. या चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम बंगाल तसेच त्रिपुरा, आसाम, नागालँड आणि मणिपूर सारख्या ईशान्येकडील राज्यांवर होणार आहे. या ठिकाणी जोरदार पाऊस आणि वारे वाहू शकतात. महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा काहीच परिणाम होणार नाही. तसेच केरळ आणि कर्नाटकमधील किनारी भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.