१२ जूनपर्यंत मनाई आदेश जारी…..

कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, ऊरुस, सण साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु आहे.

यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक २९ मे २०२४ रोजी रात्री १ वाजल्यापासून ते १२ जून २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे. हा हुकूम सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविण्या संदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना,

तसेच सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा शांततामय मार्गाने साजरे करण्यासाठी जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.