इचलकरंजीत फायबर केबलचे जाळे बनले धोकादायक

इचलकरंजीत अनेक ठिकाणी केबल तुटून अपघात होण्याच्या प्रकारात वाढ सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगामध्ये संपूर्ण जग हातामध्ये झाले आहे. इंटरनेटच्या सुविधा जास्तीत-जास्त जलद देण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यामध्ये आता फायबर केबलचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या विपरीत परिणाम सर्वत्र झाडावर, खांबावर मिळेल त्या जागेवर केबल अडकवून कनेक्शन देण्यात येत असल्याने धोका वाढत चालला आहे.

अनेक ठिकाणच्या केबल तुटून अपघात होण्याचे प्रकार वाढत चालले आहे. तेव्हा वाढते केबलचे जाळे रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस उपाय-योजना राबवाव्यात अशी मागणी शहरवासियांतून होत आहे. त्यामध्ये सध्या फायबर केबलद्वारे कमी खर्चात जादा स्पीड असलेले इंटरनेट देण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये अशरक्षः चढाओढ लागली आहे. तसेच दिवसेंदिवस इंटरनेटची सुविधा घेणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. एखाद्याने नेट कनेक्शनची मागणी केल्यास संबंधित कंपनीचे कर्मचारी मिळेल त्या जागेवर, झाडावरुन, विद्यूत खांबावरुन केबल टाकून देतात, अशा वाढत्या मागणीमुळे शहरातील विविध लहान-मोठ्या रस्त्यावर फायबर केबलचे जाळे दिसून येत आहे. संबंधित कंपन्याकडून केबल वायर टाकताना कोणतीही अटी-नियम नसल्याने मनाला पटेल तशा पद्धतीने केबल टाकलेल्या दिसून येत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना तसेच वाहनधारकांना सोसावा लागत आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाने तातडीने याबाबत कडक धोरण राबवावे अशी मागणी होत आहे.