मराठा समाज आक्रमक! कोल्हापुरात हसन मुश्रीफांना घेराव

मराठ्यांविरोधात राज्य सरकार षडयंत्र रचत असल्याचा सर्वात मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.. मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय.. त्यासोबतच कुणबी प्रमाणपत्रासाठी असलेल्या शिंदे समितीवरही जरांगेंनी सवाल उपस्थित केलीय. कुणबी प्रमाणपत्र समितीच आम्हाला नको अशी मोठी मागणी त्यांनी केलीय. आता मराठा समाज सरकारला झोपू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून दिलाय. मराठ्यांची मुलं मोठी होऊ नये हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोपही जरांगे-पाटील यांनी केला आहे.

मराठा समाज आक्रमक
दरम्यान, आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय. कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घेराव घालण्यात आला. पाटगावमध्ये नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी मुश्रीफांच्या गाड्यांचा ताफा अडवला. मुश्रीफांना घेराव घालत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय.. तर त्याआधी कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरातही मुश्रीफांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला होता.. मराठा आरक्षणावरुन सरकारने फसवल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यालाही सकल मराठा समाजाने विरोध केला आहे. अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला येऊ नये अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे.