सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका…

राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी नव्हे तर खासदारकीसाठी लढत होते असं वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. शिराळामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या सत्कार सभेमध्ये सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी त्यांनी राजू शेट्टींवर जहरी टीका केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला. यानिमित्त धैर्यशील माने यांचा सत्कार सोहळा शिराळमध्ये आयोजीत केली होता. या कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर जहरी टीका केली.

लोकसभा निवडणुकीत पाठिंबा मागण्यासाठी मी महाविकास आघाडीकडे गेलो होतो. सतेज पाटील आणि जयंत पाटील यांना मी निवडून आलो तर महाविकास आघाडीबरोबरच राहीनं असं लिहून देतो असे राजू शेट्टी म्हणाले होते, असं सदाभाऊ खोत म्हणाले. जो माणूस म्हणत होता मी अपक्ष राहणार आहे, मी कोणाच्याच आघाडीत जाणार नाही, मी शेतकऱ्यांसाठी लढणार आहे, मी शेतकऱ्यांचा उमेदावर आहे, पण त्याच माणसानं जयंत पाटील आणि सतेज पाटलांना लिहून दिलं होतं की, मी तुमचाच गुलाम राहणार आहे असं म्हणत खोतांनी शेट्टींवर टीका केली. त्यामुळं राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी नाहीतर खासदारकीसाठी लढत होते असेही खोत म्हणाले.