आजपासून अवजड वाहतुकीसाठी तिलारी घाट बंद……

तळकोकणातून पश्चिम महाराष्ट्राला  जोडणारा तिलारी घाट आजपासून (21 जून) 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दोडामार्ग ते चंदगडला जोडणाऱ्या तिलारी घाटातील अवजड वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना कोल्हापूरचे  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत.

तिलारी घाटातील जीर्ण संरक्षक कठडे, अवघड वळणांमुळं अपघाताची भीती असल्याने 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चंदगड तालुक्यातील परिते- गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी चंदगड-हेरे मोटनवाडी फाटा- कळसगादे कोदाळी-भेडशी ते तिलारी घाट मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये अमोल येडगे यांनी अवजड वाहतुकीसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत बंद करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

वाहतूक सुरक्षा उपाययोजनेनुसार वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तिलारी घाटातून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. हा घाट हा खूपच अरुंद असल्यानं घाटामध्ये वारंवार अपघात घडत असतात. घाट अवजड वाहतुकीस अत्यंत धोकादायक असून घाटातील तीव्र चढ-उतारामुळे रस्त्यांच्या वळणांवर वाहनांचा वळण बसत नाही.