खानापूर मतदारसंघात इमोशनल फॅक्टर की…..

सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम खूपच गाजू लागले आहे. अनेक नेतेमंडळीनी आपापली निवडणूक लढविण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. पण तिकीट कोणाच्या पदरात पडणार हे लवकरच स्पष्ट होईल. सांगलीतील आठवा आणि शेवटचा मतदारसंघ आहे खानापूर विधानसभेचा. विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर हा मतदारसंघ तसा गुंतागुंतीचा राहिला आहे.

शिवसेना शिंदे गटात असणारे अनिल बाबर हे आधी राष्ट्रवादीत होते. खानापुरात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात नक्कीच सहानुभूती असेल त्यामुळे त्यांचे चिरंजीव सुहास बाबर हे शिवसेना शिंदे गटाकडून सध्या विधानसभेची तयारी देखील करत आहेत. जर त्यांना तिकीट मिळालं तर इमोशनल फॅक्टर खानापूरच्या विधानसभेला महत्त्वाचा ठरू शकतो. दुसरीकडे अजित पवार गटातील सदाशिव पाटील किंवा वैभव पाटील हे निवडणुकीपूर्वी तुतारी हातात घेऊन शिंदे गटाच्या उमेदवाराला आव्हान देऊ शकतात.