पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, मुंबई- बेंगळुरू महामार्ग ठप्प

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. कालपासून या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून अनेक ठिकाणी बसवर दगडफेक, तसेच राजकीय नेत्यांच्या घरांची जाळपोळ केल्याच्याही घटना घडल्या. आजही मराठा बांधवांनी आक्रमक भूमिका घेत मुंबई – बेंगळोर महामार्ग रोखून धरला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुण्यातील नवले पुलाजवळ मराठा आंदोलकांनी टायर जाळून आणि मुंबई- बेंगळुरू महामार्गावर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी संपूर्ण महामार्ग रोखून धरला.

मराठा बांधवांच्या आक्रमक पावित्र्यामुळे संपूर्ण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या ८ ते ९ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई- बेंगळुरू महामार्गावरुन अनेकजण सातारा, सांगली कोल्हापूरकडे प्रवास करत आहेत, तसेच अनेकजण मुंबईकडे जात आहेत, मात्र आंदोलकांनी गेल्या दोन तासांपासून महामार्ग रोखून धरल्याने प्रवासी आणि वाहन चालकांचे चांगलेच हाल होत आहेत.