Vishalgad Encroachment : विशाळगडावरील हिंसक घटनांच्या प्रकरणावर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी

विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या विशाळगडावरील हिंसक घटनांच्या प्रकरणावर आज (19 जुलै) हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनानं हाती घेतलेली मोहीम तसेच विशाळगड अतिक्रमणांपासून वाचवण्यासाठी उजव्या विचारसणीच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनेचं प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला विशाळगडावरील बांधकाम पाडण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे.

तसेच बांधकामांना याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. या बांधकामांविरोधातील कारवाईदरम्यान घडलेल्या घटनांविषयी याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम सध्या स्थानिक प्रशासनानं हाती घेतली आहे. काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून ‘चलो विशाळगड’ किंवा ‘विशाळगड बचाव’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला आणि आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.