मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, दुपारी समुद्राला भरती….

 गेल्या काही तासांपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. काल रात्रीपासून या सर्व भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे शनिवारची सकाळ कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कसरतीची ठरणार, हे स्पष्ट झाले होते. आज सकाळ उजाडल्यानंतरही मुंबई आणि ठाण्यातील पावसाचा (Thane Rain) जोर कायम आहे. काल रात्री आठ वाजल्यापासून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मुंबई शहरात 91 मिमी, पूर्व उपनगरात 87 मिमी आणि पश्चिम उपनगरात 93 मिमी पाऊस पडला आहे. 

सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होताना दिसत आहे. याशिवाय, मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेचाही वेगही मंदावला आहे. मुंबईत मालाड सबवे, शेल कॉलनी, शितल सिनेमा,कुर्ला आणि आरे परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याने इथली बेस्टची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

आज दुपारी साडेअकराच्या सुमारास मुंबईच्या समुद्रात भरती येणार आहे. यावेळी समुद्रात 4.24 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तोपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील पाण्याचा निचरा होणे कठीण होईल. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज दिवसभर मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.