पूरग्रस्त भागाला जिल्हा वार्षिक योजनेतील निधीमधून मिळणार निधी !

कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या २४ तासांपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे मात्र अजूनही पाणी पातळीत थोडी थोडी वाढ होत आहे. फक्त धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत असून पुराचा धोका टळलेला नाही.म्हणून प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार नागरिकांनी स्थलांतर करुन सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

आंबेवाडी येथील पुरभागात भेट दिल्यानंतर शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, नृसिंहवाडी तसेच इचलकरंजी या पुरग्रस्त भागाची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान कुरुंदवाड, नृसिंहवाडी या भागातील सुमारे ५० कुटुंबियांचे स्थलांतर झालेल्या निवारागृहात जावून नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी पुरग्रस्त भागात आवश्यकता पडल्यास जिल्हा वार्षिक योजनेतील निधीमधूनही मदत करु असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले.निवारागृहात स्थलांतरीत करण्यात आलेल्या कुटुंबियांची योग्य ती काळजी घेतली जात असून आवश्यक त्या सर्व सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.

सोबतच आरोग्य तपासणी तसेच त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी दुधाची व्यवस्था या निवारागृहात केली आहे.कुरुंदवाड येथे कालपासून सुरू झालेल्या निवारागृहात तातडीने जेवण तसेच इतर आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी स्थानिक माध्यमांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, हिप्परगी आणि अलमट्टी या धरणामधून ३ लाख क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कर्नाटक सरकारसोबत पाणी विसर्गाबाबत योग्य नियोजन सुरु आहे. याबाबत प्रशासन हे कर्नाटक सरकारशी संपर्कात आहे.