वाळवा तालुक्यातील येथील नूतन ग्राम सचिवालय आणि इतर विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जयंत पाटील यांनी सरकारला टोला लगावला आहे. राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका घेण्याचे धाडस सरकार दाखवत नाही. त्यातच त्यांनी विधानसभा निवडणुकाही पुढे ढकलल्या आहेत.
मालवणमध्ये घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केल्यास जनता खपवून घेणार नाही, असा टोला आमदार जयंत पाटील यांनी सरकारला लगावला. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच संदीप सावंत यांनी स्वागत केले.
आमदार मानसिंगराव नाईक यांच्या भूमिकेविषयी विरोधकांत आजही संभ्रम आहे. आमदार नाईक शरद पवार गटाचे की, अजित पवार गटाचे? यावरून कार्यकर्त्यांत उलट-सुलट चर्चा होती. कार्यक्रमात ‘मानसिंगराव नाईक आमच्याच पार्टीचे आहेत,’ असे सांगत आमदार जयंत पाटील यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.