मुंबईचं वातावरण महाविकाससाठी अनुकूल असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. महायुतीसाठी लोकसभेसारखेच आव्हान कायम असल्याचे ते म्हणाले. पण सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईत जागा वाटपावरुन काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. मुंबईतील 36 विधानसभा जागांवरुन पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्याकडील जागांचे गणित पाहता काँग्रेसे आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील 36 विधानसभा जागांपैकी 21 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. तर शरद पवार गट 7 जागांसाठी आग्रही आहे. या सर्व कवायतीत काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 8 जागा उरत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवार गट मुंबईतील अंधेरी वेस्ट, वर्सोवा, कुर्ला, अणुशक्ति नगर, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांची मागणी करत आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुंबईत महाविकास आघाडी मजबूत स्थितीत आहे, असा दावा केला आहे. मुंबईत महायुतीसाठी आव्हान उभं राहिले असे ते म्हणाले. त्यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपासंबंधी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण महाविकास आघाडीत 125 जागांवर सहमती झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर महायुतीसाठी कोणतीही जागा अजिंक्य नाही असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तर महाविकास आघाडी विजयासाठी मेहनत घेणार असल्याचे सांगितले. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 288 पैकी 180 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा काँग्रेस नेत बाळासाहेब थोरात यांनी गुरूवारी, 12 सप्टेंबर रोजी केला. महाविकास आघाडीत राज्यातील 125 जागांवर सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला. तर इतर जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेत चमत्कार करण्यासाठी चंग बांधला आहे.