विजेचा शॉक लागून एका शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या दहिटणेत गावात घडली. अंबादास साळुंखे आणि कलावती साळुंखे असे मृत शेतकरी दाम्पत्याची नावे आहेत.
याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात महावितरण कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासात वाजता घडली आहे.अंबादास साळुंखे (५५), कलावती साळुंखे (४५, दोघे रा. स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्यासमोर, अक्कलकोट) असे मृत व्यक्तींची नावे आहेत.अंबादास हा वस्ती मागील शेतात बाजरीवरील पाखरं मारण्यासाठी जात होता.
तेव्हा शेतात महावितरणच्या तार तुटून पडल्या होत्या, त्यांच्या लक्षात आले नाही. तो घाईगडबडीत जात असताना तुटून पडलेल्या तारेचा धक्का लागून शेतकरी अंबादास जागेवर मृत्युमुखी पडले.त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या पत्नी कलावतीला विजेचा धक्का लागला. यात दोघांचा जागेवर मृत्यू झाला.
मयताच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.एमएसईबीत्या हलगर्जीपणामुळे सदर शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. न्याय दिल्याशिवाय प्रेत उचलणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. उपकार्यकारी अभियंता राजकुमार आडम, पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे, मंडळ अधिकारी कोळी आदींनी घटनास्थळी भेट दिली.
मयतांना तात्काळ आर्थिक मदत करून देऊ अशी लेखी ग्वाही आडम यांनी दिली. तेव्हा उत्तर पोलिस ठाण्यात एमएसईबी विरोधात गुन्हा दाखल करून शवविच्छेदन करून सायंकाळी दहिटणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.