गणराय निघाले तरी सोलापूर जिल्हा ‘आनंदाचा शिधा’ पासून वंचित…

यंदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून महायुती सरकारने राज्यातील रेशनकार्डधारकांना अवघ्या शंभर रुपयांत आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु इकडे सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सवाची सांगता होत असतानाही आनंदाचा शिधा पोहोचला नाही.केवळ तीन तालुक्यांमध्ये त्याचा लाभ मिळाला असून उर्वरित आठ तालुके अद्याप आनंदाच्या शिधापासून वंचितच राहिले आहेत. त्यामुळे बहुसंख्य रेशनकार्डधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आनंदाच्या शिध्यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चणाडाळ आणि सोयाबीन तेलाचा समावेश आहे. अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारक त्याचे लाभधारक आहेत. महायुती शासनाने यापूर्वी दिवाळी व अन्य महत्त्वाच्या सण उत्सवाचे औचित्य साधून संबंधित लाभार्थी रेशन कार्डधारकांसाठी आनंदाचा शिधा यशस्वीपणे वाटप केला होता. त्याबद्दल रेशन कार्डधारकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते. यंदाही गणेशोत्सवाचे निमित्त साधून शासनाने आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीनच तालुक्यांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचला आहे. उर्वरीत मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, बार्शी, मंगळवेढा, सांगोला आणि माळशिरस हे आठ तालुके आनंदाच्या शिधापासून अद्यापि वंचित राहिले आहेत.