जयंत पाटील यांची ग्वाही! जनता आताही ‘मविआ’लाच देणार सत्ता

भाजपने राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडत विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेने त्यांना लोकसभेत धडा शिकवला. महाविकास आघाडीला मोठे यश मिळवून दिले, आता राज्यातही सरकार जाणार या भितीने विविध योजना जाहीर करत आहेत, मात्र जनतेचा या सरकारवर अजिबात विश्वास राहिलेला नाही.आगामी विधानसभेत महाविकास आघाडीलाच जनता सत्ता देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शिवस्वराज्य यात्रा दिंडोरीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आलेली आहे. सटाणा, देवळा, कळवणमार्गे ही यात्रा दिंडोरीत येत संस्कृती लॉन्स येथे सभा झाली, त्यावेळी श्री. पाटील बोलत होते.