महायुतीच्या जागावाटपाबाबत 5 तास ‘वर्षा’वर चर्चा…

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीची काल रात्री बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. यात आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. महायुतीच्या जागावाटपावर चर्चा झाली. कोण किती जागा लढणार? कोणती जागा कुणाकडे असणार? यावर या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही बैठक झाली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले मुंबई नाका इथं उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचा अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी होती. हा दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईत आले. त्यानंतर वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आली. त्यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आता लवकरच राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीची काल बैठक झाली. पाच तास जागावाटपावर चर्चा झाली. त्यामुळे आता महायुतीचं जागावाटप कधी जाहीर होतं हे पाहावं लागेल. नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाष्य केलं. निवडणूक आयोगाने जी काही नियमावली आहे. त्याप्रमाणे लोकशाहीमध्ये नियमाने कामकाज झालं पाहिजे. नियमाने लोकशाहीमध्ये निवडणूक झाली पाहिजे, त्याप्रमाणे निवडणूक आयोग काम करतोय. लोकशाहीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. त्यांनी असंही म्हटलं आहे की मागच्या निवडणुकीत लोकांना त्रास झाला, गैरसोय झाली. ती यावेळी होता कामा नये निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला आहे, त्यांचं स्वागत करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.