परतीच्या पावसाला सुरूवात झाल्यांनंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणवगळता उर्वरित भागात पाऊस उघडीप देणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रसपाटीपासून 5.8 किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मुंबईत आज 29 सप्टेंबर रोजी कमाल आणि किमान तापमान हे 31 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुबंई परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, आज कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला असून गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मान्सून परतला आहे. अकोला, अमरावती,बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, हवामान विभागाने आजसाठी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आली आहे.अग्नेय अरबी समुद्रापासून वायव्य बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यामुळं पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान कमी होताच कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. त्यामुळं आज राज्यात पाऊस राज्यातील बहुतांश ठिकाणी विश्रांती घेणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत अंशतः ढगाळ आकाश राहिल व हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.