हातकणंगले विधानसभा मतदारसंघात तिरंगी-चौरंगी लढतीची शक्यता

विधानसभा निवडणुकीची मंगळवारी घोषणा झाली. २२ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष रणधुमाळीला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण कोणाच्या विरोधात लढणार, मैदान कोण मारणार, छुपे रुस्तम कोण, याची उत्सुकता मतदारांना लागलेली आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कॉँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांची, तर महायुतीकडून जनसुराज्य पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी निवडणूक लढविणार असल्याचे घोषित केल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर पेच निर्माण झाला आहे.

परंतु आयत्यावेळी महाविकास आघाडीमध्ये मैत्रिपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनाही उमेदवार रिंगणात उतरवून चुरस निर्माण करतील. यामुळे येथे तिरंगी अथवा चौरंगी लढत होऊ शकते.निवडणुकीमध्ये आमदार राजूबाबा आवळे यांना गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा व जनसंपर्काचा लाभ होऊ शकतो, तर माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना मागील दहा वर्षांच्या आमदारकीचा अनुभव असून, त्यांना वैयक्तिक मानणारा मोठा वर्ग आहे.

जनसुराज्य पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांनी २०१९ मध्ये निवडणूक लढविली, मात्र त्यांना अपयश आले. तरीही विधानसभेच्या निवडणुकीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पराभव झाल्यापासून त्यांनी पाच वर्षे पायाला भिंगरी बांधून जनसंपर्क ठेवला आहे.

पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश बनगे यांचे नाव इच्छुकांमध्ये आहे. लाडकी बहीण योजनेच्या तालुका अध्यक्षपदाचे काम चांगले केल्याने त्यांचा संपर्कही वाढला आहे. निवडणुकीमध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवारांचा वैयक्तिक जनसंपर्क, केलेली विकासकामे, नेत्यांवरील निष्ठा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिलेल्या वागणुकीसह इतर अनेक हाताळाव्या लागणाऱ्या गोष्टींचा कस लागणार आहे.

सध्या निवडणूक तिरंगी अथवा चौरंगी वाटत असली, तरी काही अपक्ष उमेदवार पाच हजारांपासून पंधरा ते वीस हजार मतदान घेऊन एखाद्या निवडून येणाऱ्या उमेदवाराचा पराभव करण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांनी याचा सखोल अभ्यास करून रणनीती आखणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकीमध्ये संभाव्य उमेदवार म्हणून आमदार राजू आवळे, अशोकराव माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, अविनाश बनगे, वैभव कांबळे, प्रमोद कदम यांची नावे सध्या चर्चेत आहेत.