“सामन्यानंतर जास्त बोलणारा मी नाही”, रोहित पराभवानंतर स्पष्टच बोलला

टीम इंडियाला बंगळुरु कसोटीत न्यूझीलंड विरुद्ध 8 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. आम्ही कमबॅक करण्याबात विचार करत आहोत. न्यूझीलंडने सलामीच्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात 107 धावांचं आव्हान 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. न्यूझीलंडचा हा भारतातील एकूण तिसरा तर 36 वर्षांनी पहिला विजय ठरला. न्यूझीलंडने याआधी भारतात 1988 साली अखेरचा कसोटी सामना जिंकला होता. टीम इंडिया सामन्यातील पहिल्या डावात ढेर झाली.

न्यूझीलंडने टीम इंडियाला 46 रन्सवर ढेर केलं. मात्र भारताने दुसऱ्या डावाच तितकंच अप्रतिम पुनरागमन करत सामना पाचव्या दिवसापर्यंत नेला.दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून सर्फराज खान याने सर्वाधिक 150 धावांचं योगदान दिलं. तर ऋषभ पंतने 99 धावा केल्या. न्यूझीलंडने टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 46च्या प्रत्युत्तरात 402 धावा केल्या. त्यानंतर भारताने 462 धावा करत न्यूझीलंडला 107 धावांचं आव्हान दिलं. न्यूझीलंडने हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि विजय मिळवला.“मी सामन्यानंतर जास्त बोलणाऱ्यांपैकी नाही. या खेळाडूंना माहितीय की ते कुठे उभे आहेत.

 प्रत्येकाला टीमबाबत माहिती आहे.  मी कुणाबद्दलही काहीच वेगळं म्हणणार नाही. ज्यालाही संघात स्थान मिळेल, त्याला स्वत:ला सिद्ध करावं लागेल. काही खेळाडूंना प्रतिक्षा करावी लागत ही चांगली बाब आहे. मात्र या सामन्यात शुबमन गिल नव्हता ही आमच्यासाठी दुख:द बाब आहे. त्यामुळे सर्फराजला संधी मिळाली आणि त्याने उल्लेखनीय कामगिरी केली”, असं रोहित सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला. शुबमन गिल याला दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून माघार घ्यावी लागली.

जेव्हा तुम्ही पहिला सामना खेळता तेव्हा तुम्ही पराभवाबाबत विचार करत नाही. आम्ही साधारण क्रिकेट खेळण्याचा विचार करत नाही. पहिल्या सामन्यात विजय अपेक्षित असतो. आम्ही न्यूझीलंडला कडवी झुंज दिली. मी या सामन्याबाबत फार विचार करणार नाही, कारण पहिल्या 3 तासांमध्ये कोणत्याच संघाचा तुम्ही अंदाज बांधू शकत नाही. आम्हाला या मालिकेत कमबॅक करण्याचा मार्ग शोधावा लागेल. मला प्रत्येकाचा अभिमान आहे. आता आमचं लक्ष हे पुण्यात होणाऱ्या कसोट सामन्याकडे आहे”, असं रोहितने नमूद केलं.