विधानसभा निवडणुकीनंतर भाजप मनधरणीसाठी ‘मातोश्री’वर जाणार? पीयूष गोयल यांची मोठी भविष्यवाणी

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फुटला आहे. राजकीय वातावरण तापले आहे. प्रचाराचा धडाका सुरू आहे. यंदा राजकारणाची अभूतपूर्व खिचडी झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशाच खिचडीतून तयार झाली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप एकीकडे मनसेला सोबत घेण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याची चर्चा पण रंगली आहे.

तर भाजप नेते पीयूष गोयल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आशावादी असल्याचा दावा केला आहे.एका कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार का, असा सवाल विचारण्यात आला होता. भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरु असल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता, त्यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगितले. “मी स्पष्ट करतो की, पडद्यामागून कुठलीही चर्चा, संवाद, संपर्क करण्यात आलेला नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत अजून मजबुतीने उभे आहोत. त्या शिवसेना गटासोबत आमचा काही एक संबंध नाही.” अशी प्रतिक्रिया गोयल यांनी दिली.