कांदा पुन्हा रडवणार! पावसाळ्यापर्यंत दर असेच राहणार किलोचा भाव…

बदलत्या वातावरणाचा परिणाम हा शेतीवर होतच असतो. लहरी हवामानाचा फटका बसल्याने गेल्या वर्षभरात कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. आता पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांद्याचे पीक शेतातच आडवे झाले. परिणामी कांद्याची टंचाई कायम राहणार असून जून, जुलै या महिन्यांत चांगला कांदा येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत बाजारात कांद्याचे दर चढेच राहणार आहेत, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला.वर्षभरात लहरी हवामान, अवकाळी पाऊस यामुळे कृषिमालाचे मोठे नुकसान झाले आहे. डाळी, कडधान्ये, दैनंदिन वापरासाठी लागणारा भाजीपाला, याच्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यातच कांदा पिकाला मोठा फटका बसला. मागच्या वर्षभरापासून कांद्याची आवक कमी होत आहे. कांद्याची टंचाई पूर्ण करण्यासाठी परदेशातील कांद्याची आयात काही व्यपाऱ्यांनी केली होती. मात्र या कांद्याला आपल्या कांद्याची सर नसल्याने, तो भारतीयांच्या पसंतीत उतरला नाही.

मुंबईच्या घाऊक बाजारात येणाऱ्या एकूण कांद्यापैकी फक्त २० टक्के कांदा उत्तम दर्जाचा आहे. ८० टक्के कांदा दुय्यम दर्जाचा आहे. मोठ्या प्रमाणात येणारा कांदा हा पाण्याने भिजलेला, ओलसर आहे. त्यामुळे तो जास्त काळ टिकणारा नाही. शेतकरी भिजलेला कांदा वाळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर ते शेतात नव्याने कांदा लावणार आणि तो कांदा बाजारात येण्यास पावसाळा उजाडणार, असे एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे तोपर्यंत बाजारात कांद्याची टंचाई भासणार आहे. कांदा दरातही तेजी कायम राहणार आहे, असा अंदाज व्यापारी मनोहर तोतलानी यांनी वर्तवला.

घाऊक बाजारातील कांदा दर

नवीन चांगल्या दर्जाचा कांदा

घाऊक दर : ४० ते ५० रुपये किलो

किरकोळ दर : ६० ते ६५ रुपये किलो

दुय्यम दर्जाचा कांदा

घाऊक दर : ३० ते ४० रुपये किलो

किरकोळ दर : ५० ते ६० रुपये किलो