मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचे उमेदवारांसाठी निर्बंध; केवळ वापरता येणार तीन वाहने

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. या मतदानाच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने निर्बंध लावले आहेत. यात प्रामुख्याने उमेदवारांना केवळ तीन वाहनांचा वापर या दिवसासाठी करता येणार आहे.राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) रिंगणात असलेल्या उमेदवारांकडून मागील दहा- पंधरा दिवसांपासून जोरदार प्रचार सुरु आहे.

मतदारसंघात प्रचारासाठी प्रत्यक्ष उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते फिरत आहे. या प्रचार दरम्यान देखील निवडणूक आयोगाने काही निर्बंध लावले होते. अर्थात त्याचे पालन होत आहे कि नाही यावर निवडणूक आयोगाचे लक्ष होते. आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी देखील निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी निर्बंध जारी केले आहेत.

निवडणूक आयोगाचे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निर्बंध लावले असून यात मतदानाच्या दिवशी उमेदवाराला स्वतःसाठी व निवडणूक प्रतिनिधीसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी असे केवळ तीन वाहने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय एका वाहनात वाहन चालकासह केवळ पाच व्यक्ती असावेत; अशी अट देखील लावण्यात आली आहे.

इतकेच नाही तर उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते वापरत असलेल्या वाहनांचे परवाने आणि संपूर्ण माहिती हि दर्शनी भागात लावावे. तसेच उमेदवाराचे नाव आणि क्षेत्र देखील वाहनावर असणे बंधनकारक आहे. शिवाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय इतर वाहन वापरल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.