विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला जोरदार यश मिळालेले आहे. यश मिळाल्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद देण्यासाठी फोनाफोनी सुरू केलेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना इचलकरंजीतून 40 हजारांचे मताधिक्य मिळालेले होते. यासाठी जिल्हा शिवसेनाप्रमुख रवींद्र माने यांनी चांगल्या जोडण्या लावल्या होत्या. याच आधारावर त्यांनी विधानसभा लढविण्याची तयारी केली होती. परंतु इचलकरंजीची जागा भाजपला सुटल्याने मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून रवींद्र माने यांनी थांबण्याचा निर्णय घेतला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी महायुतीची सत्ता आल्यानंतर मोठी संधी देण्याचा शब्द दिलेला होता. रविवारी दुपारी मुख्यमंत्री शिंदे यांनी रवींद्र माने यांना दूरध्वनीवरून डॉ. राहुल आवाडे यांच्या विजयाबद्दल धन्यवाद दिले. तसेच आज सोमवारी सायंकाळी होत असलेल्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचा संदेश देखील दिला. आगामी काळात आता रवींद्र माने यांना कोणती मोठी संधी मिळणार हे पहावे लागेल.