23 नोव्हेंबर म्हणजेच शनिवारच्या दिवशी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याला खानापूर, गोपीचंद पडळकर सुहास बाबर तासगाव-कवठेमहांकाळ, शिराळा आणि जत येथून चार नवीन चेहरे आमदार म्हणून मिळाले. यापैकी तिघेजण वारसदार आहेत. गोपीचंद पडळकर हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. परंतु ते विधानसभेला प्रथमच निवडून आले. तर शिराळ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक, जतमध्ये काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना पराभवाचा धक्का बसला.
खानापूरमधून दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर आणि तासगाव-कवठेमहांकाळमधून दिवंगत आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली. शिराळ्यातून दिवगंत नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजीत देशमुख यांनी बऱ्याच संघर्षानंतर विजय खेचून आणला. त्यामुळे दिवंगत तीन नेत्यांचे वारसदार यंदा निवडून आले. तर पलूस कडेगावमधून दिवंगत नेते संपतराव देशमुख यांचे पुत्र संग्रामसिंह देशमुख यांनी प्रथमच निवडणूक लढवली.
पहिल्याच प्रयत्नात त्यांनी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्याशी कडवी झुंज दिली. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. जतमध्ये विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत अशी दोन आमदारांमध्ये लढत होती. पडळकर यांनी जोरदार मुसंडी मारून बदललेल्या मतदारसंघातून विजय मिळवला. भूमिपुत्र विरूद्ध परका, अशा लढाईत जत मतदारसंघातील मतदारांनी बाहेरील उमेदवाराला विजयी केले.
युवानेते रोहित पाटील, सुहास बाबर, सत्यजीत देशमुख, गोपीचंद पडळकर हे जिल्ह्याला आमदारकीचे चार नवे चेहरे मिळाले. तर रिंगणात असलेल्या मानसिंगराव नाईक आणि विक्रमसिंह सावंत यांना पराभवाचा धक्का बसला. उर्वरित जयंत पाटील, विश्वजीत कदम, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांनी गड राखला.