विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला २३५ जागा मिळत मोठे यश प्राप्त झाले आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पाच जागेवर महायुतीने यश मिळवले आहे. महाराष्ट्र राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस असे यश प्राप्त झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनी मोठा विजय मिळविला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अतिशय विश्वासू शिलेदार असलेले दिवंगत आमदार अनिल बाबर यांची मंत्रिपदी वर्णी लागेल, अशी शक्यता अनेकवेळा वर्तवली जात होती.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावामध्ये अनिल बाबर यांनी प्रथम साथ देत दुष्काळी भागासाठी पाणी योजना पूर्ण करण्याची तळमळ व्यक्त केली होती. सांगली जिल्ह्यात एकमेव आमदार असल्याने यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना मंत्रिपद देऊन पक्ष वाढीसाठी व दुष्काळी पट्ट्यातील मंत्रिपदाचा दुष्काळ संपवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.दरम्यान, खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दोन्ही सुपुत्र एकाचवेळी आमदार म्हणून निवडून आले असून दोन्ही वेगळ्या पक्षाचे आहेत. दोन्हींच्या रूपात खानापूर विधानसभा मतदारसंघाचा मंत्रिपदाचा दुष्काळ संपणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
